नवरात्रीच्या काळात देवीतत्त्व हजारो पटीने असते अधिक कार्यरत! तेव्हा नवरात्रीत मनोभावे पूजा अर्चना करणे अधिक उचित! नवरात्रीत नऊ संख्येलाही मोठे महत्त्व--ह भ प संजयजी महाराज जगताप

शिर्डी (राजकुमार गडकरी)सध्या सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव मोठा उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. या नवरात्रीचा इतिहासही मोठा आहे. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.तर  महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.अशी माहिती प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी दिली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की या नवरात्री मागील अध्यात्मिक व सर्व दृष्टीने मोठे महत्त्व आहे.`जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.उपांग ललिता' ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.
नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात `श्री दुर्गादेव्यै नम: ।'' हा नामजप जास्तीतजास्त करावा.
घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.
अखंड दीपप्रज्वलन करणे. म्हणजे दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे...नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.
देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे.देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
 देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी‌ साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.
 कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.
देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.'
देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया‌ काढल्या जातात.
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व असते. शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते; म्हणून अशा आकृतीबंधांनी युक्‍त रांगोळी काढतात. नवरात्री देवी पुढे गरबा खेळला जातो ‌
गरबा/भोंडला खेळणे'' म्हणजे काय? तर 
गरबा/भोंडला खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. हे खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे  देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते.  सध्या शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. या नवरात्रीला अध्यात्मिक क्षेत्रात मोठे महत्त्व आहे. तसेच नऊ  संख्येलाही मोठे महत्त्व असे हभप संजयजी महाराज जगताप (भऊरकर) असेही त्यांनी म्हटले असून नवरात्रीत नऊ संख्येलाही मोठी महत्त्व आहे. नवरात्रीत घटाभोवती  पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं असतात. त्यामध्ये साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी असते.
दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार आहेत. शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री होय.तर
दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं  आहेत.ती अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका होय.
महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं  आहेत. वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला). यांना देवी मंदिरांची महती सर्व दूर पसरली आहे. तसेच नवरात्रींचे ‘वेगवेगळे नऊ’ रंग   शुभ मानले जातात.सन २०२५ मध्ये नवरात्रीचे ९ रंग  पांढरा, लाल, रॉयल निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, नारंगी, मोर हिरवा आणि गुलाबी हे रंग या वर्षीच्या नवरात्रीचे ९ रंग आहेत.
नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा  आहेत.रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश हे होय.
नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं आहेत.ती  माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी हे आहेत.नऊ’ प्रकारची दानं या नवरात्रीत केले जाते. अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान हे होय.
नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन होय.
प्रसिद्ध ‘नऊ’ नाग आहेत. शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ हे नऊ नाग होय.
समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड  असून ते म्हणजे भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य) होय.
मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश म्हणजे अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय होय.
मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म आहेत. धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य असून
मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था आहेत. मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू होय.
नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं : आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान हे होय. त्यामुळे नवरात्री आणि नऊ संख्या यांना मोठा आध्यात्मिक आधार असून नऊ ही संख्या नवरात्रीत महत्त्वाची ठरत आहे. असे मत प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे