येत्या दहा दिवसाच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या! आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही--मनोज जरांगे पाटील

जालना (प्रतिनिधी) येत्या १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीरसभेत बोलत होते. त्यांच्या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य लोकांनी उपस्थिती लावली आहे.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, “तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. आम्ही सरकारला शेवटची विनंती करतो. मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं. चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या, आधार घेऊन कायदा पारित करतो, असं आश्वासन तुम्ही दिलं होतं. आता पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा.”
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो, या राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाची विनाकारण हालअपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घ्यावा. सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा जाहीर निर्णय करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहण्याची आता आमची तयारी नाही,” असंही मनोज जरांगे म्हणाले.
केंद्राला आणि राज्याला सांगतो, आज मराठ्यांचं ‘आग्या मोहोळ’ शांत आहे, हे ‘आग्या मोहोळ’ एकदा उठलं, तर मग हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून देशाला अन्नधान्य पुरवतो. त्यांची लेकरं आरक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. माझंही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, हे गोरगरीब मराठ्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आरक्षण द्या असे यावेळी ते म्हणाले.

आज आपल्याला महत्त्वाच्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून आपण इथे सगळे जमलो आहोत. आज मराठा समाजासाठीचा सुवर्णक्षण आला आहे. या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झाला आहे. घराघरांतला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून सांगणार आहे की मी माझ्या नातवासाठी, मुलासाठी ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झालो आहे. आरक्षणासाठी मराठा पेटून उठला आहे. महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात १० दिवस आहेत. आज जो जनसमुदाय आंतरवलीत आला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे राहिलेल्या दहा दिवसात मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करा.
मराठा समाजाने जो शब्द दिला आहे त्यावर मराठा समाज ठाम आहे. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले आहेत. त्यात आम्ही ४० दिवसांत आम्ही काहीही विचारणार नाही हे सांगितलं होतं आम्ही तो शब्द पाळला आहे. आता सरकारच्या हातात आणखी १० दिवस आहेत या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज कार्यक्रम स्थळी येत आधी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी आपलं भाषण सुरु केलं. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात राज्यातून मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विविध घोषणाही देण्यात येत होत्या. सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!